युवाराष्ट्र राबवणार गुलाबी बोन्ड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विदर्भ,मराठवाड्यात धडक कार्यक्रम

0
1150

अकोलाः
“युवाराष्ट्र” अकोला जिल्ह्याच्या सामाजीक क्षितिजवरील एक आश्वासक नाव! जिल्ह्यासह वऱ्हाडाच्या कृषी,आरोग्य,शिक्षण,पर्यावरण, महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत “युवाराष्ट्र” ने स्थापने पासून सातत्यपूर्ण अविरत योगदान दिले आहे.बळीराजाच्या प्रत्येक अडचणीत सक्षमपणे उभे ठाकणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगार असो वा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो युवाराष्ट्र आपल्या योगदानात सतत अग्रेसर राहीले आहे.राज्यात गेल्या हंगामापासून हैदोस घालत असलेल्या कापसावरील गुलाबी बोन्ड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी “युवाराष्ट्र” ने कंबर कसली असून विदर्भ,मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात “युवाराष्ट्र” यासाठी धडक व व्यापक मोहिमेला लवकरच प्रारंभ करीत आहे.बळीराजाचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी या मोहिमेअंतर्गत शर्थी चे प्रयत्न करणार असल्याचे युवाराष्ट्र चे डॉ निलेश पाटील व विलास ताथोड यांनी कळविले आहे.2014- 15 च्या हंगामात गुजरात मध्ये ओढवलेल्या कापसावरील गुलाबी बोन्ड अळी च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार,स्वयंसेवी संस्था,कंपन्या,माध्यमे आदींनी ज्या प्रकारे एकत्रीत लढा उभारुन सक्षमपणे कापूस पिकाला वाचविले त्याच धरतीवर विदर्भ,मराठवाड्यातील कापूस उत्पादक क्षेत्रांत एकात्मिक कीड नियंत्रणासाठी धडक व व्यापक मोहीम लवकरच “युवाराष्ट्र” उभारणार आहे.
कापसवरील गुलाबी बोन्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या हंगामात राज्यातील कापसाच्या 43% एवढि मोठी घट आली होती. उत्पादनातील या घटीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतमजूर,जीनिंग,प्रेसिंग,व्हीविंग,गारमेंट्स व ट्रान्सपोर्ट आदी उद्योगांना व त्यांवर अवलंबुन असलेल्या कामगारांना ही मोठा फटका सहन करावा लागला.या पार्श्वभूमीवर “युवाराष्ट्र” सारख्या वऱ्हाडातील एका आश्वासक संस्थेने या कामासाठी पुढे येणे निश्चितच प्रेरणादायी आहे. “युवाराष्ट्र” चे पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी बोन्ड अळीच्या प्रश्नांवर काम करीत असून दि ११ मार्च रोजी डॉ पं दे कृ वि अकोला येथे तत्कालीन कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या गुलाबी बोन्ड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी च्या कार्यशाळेला उपस्थिती लावून अधिकारी व संशोधकांच्या बरोबरीने गुलाबी बोन्ड अळी च्या एकात्मिक नियंत्रणसाठी प्रशिक्षण प्राप्त करून घेतले आहे.कापसामध्ये नवीन तंत्रज्ञानाची अडवणूक व उपलब्ध तंत्रज्ञानाला प्रतिरोधकता निर्माण झालेली असतांनाही दिरंगाईचे धोरण यामुळे याही वर्षी मोठया प्रमाणात गुलाबी बोन्ड अळीमुळे नुकसानाची शक्यता टाळण्यासाठी सर्वच स्तरांतून युद्धपातळी वर प्रयास गरजेचे आहेत.
अशा परिस्थितीत “युवाराष्ट्र” आपल्या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांत किमान दोन रथ,10 तज्ञांची टीम,प्रोजेकटर्स, स्लाईड शो,एकात्मिक नियंत्रणासाठी मार्गदर्शक साहित्य व तज्ञांचे मार्गदर्शन ना नफा ना तोटा तत्वावर कामगंध सापळ्यांची उपलब्धता,बोन्ड अळीची लागण, नुकसान पातळी,एकात्मिक नियोजन,कीटकनाशके याबाबत सविस्तर मार्गदर्शन व उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत रथरुपी गाड्या द्वारे गावागावांत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत “युवाराष्ट्र” पोहोचविणार आहे.गेल्या हंगामात आधीच आत्महत्याग्रस्त असलेल्या भागांत गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसानासह कीटकनाशकांवरील अधिकचा भुर्दंड,जहाल कीटकनाशकांच्या असुरक्षित वापरामुळे हजारो शेतकऱ्यांना,शेतमजुरांना झालेली विषबाधा व 75 शेतकऱ्यांचे जीवानिशी जाणे या पार्श्वभूमीवर “युवाराष्ट्र” ने पुन्हा एकदा कालानुरूप बळीराजाच्या प्रश्नावर सकारात्मक दोन हात करण्याची चालवलेली सिद्धता निश्चितच आशादायी व प्रेरणादायी अशीच आहे. “युवाराष्ट्र” या उपक्रमाला लवकरच प्रारंभ करणार असून गुलाबी बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी यशस्वी ठरलेल्या गुजरात पॅटर्न च्या धर्तीवरील सर्वसमावेशक व धडक आशादायी सुरुवात या निमित्ताने विदर्भ,मराठवाड्यात या निमित्त बघायला मिळेल