चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करणार – एसडीपीओ शिंगटे – अल्पवयीन मुलाला पीएसआय लसंते यांनी मारहाण केल्याचे प्रकरण

0
1450
Google search engine
Google search engine

वडिलांनी केला होता आरोप

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

     कोणतेही ठोस कारण नसतांना शहरातील एका निष्पाप अल्पवयीन मुलाला पकडून त्याला मारहाण केले असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला होता. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन केली असता सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे नव्यानेच मुंबईवरून रूजु झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी सांगितले.

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महादेवघाट परिसरात राहणारे राजेश कालकाप्रसाद विश्वकर्मा (४५) यांच्या घरी रविवारी नाव ठेवण्याचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या घरी नातलग पाहुणे सुध्दा होते. त्यांचा १७ वर्षीय मुलगा अजय राजेश विश्वकर्मा व इतर पाहुणे कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री घरासमोर ओट्यावर बसले असता रात्री १ च्या दरम्यान चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय लसंते व त्यांचे सहकारी यांनी अजय विश्वकर्मा ला कोणतेही ठोस कारण नसतांना जबरदस्तीने पोलीस गाडीत बसवून अजय सोबत असलेला विक्की विश्वकर्मा याने पोलीसांना याबाबत विचारले असता त्यालाही घानेरड्या शिव्या देऊन त्याच्यावर दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अजयला गाडीत बसविल्यावर पीएसआय लसंते यांनी पैसे देऊन मॅटर सलटवतो अन्यथा मुलाला आतमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप सुध्दा राजेश विश्वकर्मा यांनी केला आहे. सदर महाभयंकर अन्याय पीएसआय लसंते व इतर कर्मचारी यांनी केल्यामुळे अजय विश्वकर्मा दहशतीत असल्याचे सांगितले. अजयने पोलीस आपल्याला पुन्हा पकडून नेतील का ? अशी धास्ती धरली असून त्याने जेवन बंद केले आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत होईल व प्रकृतीवर वाईट परिणाम झाल्यास त्याला पीएसआय जबाबदार राहिल असेही वडिलांनी तक्रारीत सांगितले होते. त्यामुळे पीएसआय लसंते यांच्यावर कारवाईची मागणी वडिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली तसेच सदर तक्रार ग्रामिण पोलीस अधिक्षक व पोलीस महानिरीक्षक, मुंबई यांच्याकडे पोस्टव्दारे पाठविली. या प्रकरणात अल्पवयीनाला मारहाण केल्याचे पीएसआय लसंते यांनी फेटाळले होते. केवळ संशयीत म्हणून ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिल्याचे सांगितले.

या प्रकरणाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, वडिलांच्या तक्रारीवरून सदर प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर काढणार आहो व त्यामध्ये अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पीएसआय लसंते यांच्यावर कारवाई होणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.