चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
धामणगाव रेल्वे वरून बडनेरा ला जाणाऱ्या अमरावतीच्या एका व्यक्तीचा चांदूर रेल्वे येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेवाग्राम एक्सप्रेसने कटून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १७) रात्री ११.५२ वाजता घडली.
प्राप्तमाहितीनुसार, अमरावतीमधील कंवरनगर येथील रहिवासी किसनचंद हरवानी (४५) यांचे धामणगाव रेल्वे येथे खानावळ आहे. ते दररोज रेल्वेने अमरावतीवरून धामणगाव रेल्वे येथे अप-डाऊन करीत होते. अशातच मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे खानावळ बंद करून नागपुर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस (१२१४० दादर) ने ११.३९ वाजता धामणगाव वरून निघाले होते. गाडी चांदूर रेल्वे स्टेशनवर ११.५१ वाजता थांबल्यानंतर ते जनरल बोगीमधून खाली उतरले. व लगेच दुसऱ्या बोगीमध्ये चढत असतांना चालत्या गाडीत पाय घसरल्यामुळे ते रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधात अडकले. ही बाब टी. सी. यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत गाडी थांबविली. त्यानंतर त्यांना बाहेर काढले असता या अपघातात त्यांचा एक हात कटला होता. यानंतर १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला बोलावून स्थानिक ग्रामिण रूग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व २४ वर्षीय मुलगा आहे.