अनिल चौधरी, पुणे
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी व आरक्षणासाठी परळीत सुरु असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे .
मराठा समाजाच्या विविध मागण्या आहेत. आतापर्यंत मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय शांततेने ५८ मोर्चे काढले आहेत. पण सरकारला या मोर्चे व आंदोलनाचा काहीही फरक पडला नसल्याची भावना मराठा समाजात झाली आहे. त्यात परळी तहसील समोर आंदोलनकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत लेखी ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन विसर्जित करायचे नाही , अशी भूमिका घेतली आहे. दोन दिवसापासून आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसरात ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्या जिल्ह्यात उमटू लागले आहेत. याच आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती कि, राज्य शासनाच्या मेघाभरतीच्या माध्यमातून ७२ हजार जागा भरणार आहेत. या जागांपैकी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली होती. मात्र, आरक्षणाच्या ठोस आश्वासनाशिवाय व मुख्यमंत्र्यांचे लेखी पत्र हातात पडल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा पवित्रा परळीतील आंदोलकांनी घेतला आहे.
पुण्यातल्या या आंदोलनात मराठा समाजाचे भालचंद्र बगाडे, विकास पवार, सागर गोरे, समाधान पवार, सुरेश खोपडे, आकाश दरेकर, महेश शेळके, महेश पानसरे, वैशाली बगाडे, ऐश्वर्या बालघर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.