अन्यथा समाजकल्याण कार्यालयाला तीव्र घेराव आंदोलन ; ‘एसएफआय’चा इशारा
प्रतिनिधी :- दिपक गित्ते
बीड (ता.२४) : नवीन शैक्षणिक वर्ष संपूर्ण तीन महिने उलटले आहे. तरीदेखील नव्याने शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारणे आजही सुरु झालेले नाही. प्रशासनाने तात्काळ शिष्यवृत्ती अर्ज भरून घ्यावे, अन्यथा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने हजारो विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला जबरदस्त घेराव आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ‘एसएफआय’ जिल्हा कमिटीने दिला आहे.
समाजकल्याण विभागाच्या उदासीनतेमुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे अजूनही सुरु झालेले नाही. प्रवेश प्रक्रिया संपून परीक्षा फॉर्म भरणे सुरु झाले, तरीपण समाजकल्याण विभाग आजूनही झोप काढत आहे. आजपर्यंत अर्ज भरण्यास सुरुवात न होणे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेल्या अधिकारांची हि गळचेपी आहे. शिष्यवृत्ती योजना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास सहाय्य करते. अशा वेळी प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे बहुजन विद्यार्थी या योजनेपासून दूर राहत आहे. सरकार आणि प्रशासनाने शिष्यवृत्ती योजनेचे दिवाळे काढले आहे. म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या असंतोषाची वाट पाहू नये. तात्काळ शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारणे सुरु करावे. अन्यथा हजारो विद्यार्थ्यासह जिल्हा समाजकल्याण विभाग कार्यालयाला जबरदस्त तीव्र घेराव आंदोलन करण्याचा इशारा ‘एसएफआय’ जिल्हा कमिटीने दिला आहे.