चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यात चांदुर रेल्वे – अमरावती या मुख्य रस्त्याची अवस्था तर पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या काही वर्षांत कुठलीही मोठी दुरुस्ती न झालेली नाही. त्यामुळे चांदूर रेल्वे – अमरावती रस्त्याची तत्काळ सुधारणा करण्याची मागणी चांदूर रेल्वेचे शहरवासी प्राविण्य देशमुख यांनी अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला निवेदन देऊन केली आहे.
चांदूररेल्वे शहरवासी तसेच तालुक्यातील इतर ग्रामस्थांसाठी जीवन जगण्याचा मुख्य रस्ता म्हणून अमरावती ची ओळख आहे. शहरातील प्रत्येक व्यवसाय अमरावती शहरावर आधारलेला आहे. परंतु सध्या चांदुर वासियांची हि नाळ तुटली असून खराब झालेल्या रस्त्यांमुळे अमरावती जाणे म्हणजेच चांदूर वासियांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. शहरातील अमरावती रोड वरील पेट्रोलपंपपासून थेट चिरोडी, पोहरापर्यंत छिन्नविछिन्न झाला आहे. त्यामुळे वाहनचालक नियम सोडून कधी उजवीकडुन तर कधी डावीकडुन चालवितांना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहे. त्यामुळे अमरावती – चांदूर रेल्वे रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी चांदूर रेल्वे येथील प्राविण्य देशमुख यांनी अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला निवेदन देऊन केली आहे.
सामान्यांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का ? – प्राविण्य देशमुख
चांदूर रेल्वे – अमरावती रस्त्याची स्थिती पाहता सामान्य नागरिकांना प्रवासाकरिता होत असलेला त्रास धोकादायक आहे. रस्त्याच्या कडेला तसेच मधोमध खड्डे पडलेले आहे. वर्दळीच्या अशा रस्त्यावरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कुणा सामान्यांचा बळी जाण्याची वाट न बघता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा.