१. ‘सी.बी.आय.’ने आरोपींची कोठडी वाढवण्यासाठी दिलेल्या अर्जात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांचा हात असल्याचा दावा केला आहे. अभ्यासहीन अर्ज कसा करायचा, याचे चांगले उदाहरण म्हणजे हा अर्ज आहे; कारण कलबुर्गी यांची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये झालेली असतांना या अर्जात मात्र ती वर्ष २०१६ मध्ये झाल्याचे, तर वैद्यकीय अहवालात डॉ. दाभोलकरांच्या छातीत आणि डोक्यात गोळी लागलेली असतांना सचिन अंदुरेने त्यांच्या पोटात गोळी मारल्याचे नमूद केले आहे. या अर्जावरून आताच आम्हाला आरोपी ठरवण्याचा आटापिटा केला जाऊ नये. ‘सी.बी.आय.’चे नंदकुमार नायर यांचे काळे कारभार आम्ही याआधीच उघड केले असल्याने त्याचा राग म्हणून त्यांनी असे कारस्थान केले आहे.
२. आधी अन्वेषण यंत्रणांनी समीर गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याचे सांगितले. त्यानंतर सारंग अकोलकर यांनी गोळ्या झाडतांना पाहिले असल्याचे उमा पानसरे यांनी सांगितले. उद्या उमा पानसरे यांनीच गोळ्या झाडल्याचेही अन्वेषण यंत्रणा म्हणतील. म्हणजे नेमक्या गोळ्या किती जणांनी झाडल्या ? अशा प्रकारे हे अन्वेषण भरकटले आहे. अन्वेषणामध्ये राजकारण होत आहे.
३. ‘कुत्र्याला पिसाळलेला म्हणा आणि ठार मारा’, अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे भगवा आतंकवादी ठरवून हिंदुत्वनिष्ठांना संपवण्याचा कट चालू आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला जात आहे का, याविषयी आम्हाला शंका वाटत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी या अन्वेषणाची दुसरी बाजूही समाजापुढे आणावी.