अपघातानंतर एका मुलासोबत आई नदी पात्रात पडली
आईला वाचवण्यात यश तर एक मुलगा बेपत्ता
अमरावती – (विशेष प्रतिनीधी)
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेजवळील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रावरील पुलावर गुरुवारी सायंकाळी महिंद्रा पीकअप दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात अपघातानंतर दुचाकी वरील महिला व एका बालकासह पुलाखाली पाण्यात पडले होते. यात महिलेला वाचवण्यात यश आले असून बालक मात्र पाण्यात वाहत गेला. या अपघातात एकूण तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात स्वराज दिवाकर राजूरकर वय (४वर्ष) रा.चांदूर रेल्वे हा पाण्यात वाहून गेला आहे.
प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील जळगाव बेलोरा येथून विभा दिवाकर राजूरकर ( वय ३५ वर्ष) रा.चांदूर रेल्वे ह्या आपल्या विराज व स्वराज या ४ वर्षाच्या दोन जुड्या मुलां सोबत व भाऊ निलेश रमेश डहाके वय २५ वर्ष रा.जळगाव बेलोरा हे दुचाकी क्र. एम एच ३२ एक्स ५२८७ ने जात चांदूर रेल्वेला येत होत्या. मात्र आर्वी वरुन भरधाव येणारा महिंद्रा पीकअप क्र.एम एच ०१ एल ए. ४५०९ ने दुचाकीला धडक मारली. यात अपघातानंतर दुचाकी वरील विभा नामक महिला आपल्या स्वराज नामक मुलासोबत पुलाखाली पडली होती. व निलेश डहाके व विराज पुलावरील रस्त्यावर पडले. यात पाण्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश आले. परंतु यातील स्वराज नामक बालक पाण्यात वाहून गेला आहे. यातील महिलेला आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यात महिला, दुचाकी चालक व एक बालक जखमी झाले. अपघातानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कलकोटवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पाण्यात वाहून गेलेल्या स्वराज चा बोटीच्या सहाय्याने शोध घेणे सुरू आहे.