चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान)
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गेल्या ३ वर्षापासून विविध उपक्रम राबवित शाळा १०० टक्के प्रगत करण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन होत आहे. असे असतांना वरच्या वर शासनाचे प्रगत चे निकष बदलत आहे. शासनाच्या याच उपक्रमाला पुढे नेत सन्मान गुणवत्तेचा सन्मान प्रेरणेचा हे अभियान चांदूर रेल्वे तालुक्याने हाती घेतले असून विविध निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची स्पर्धा घेऊन त्यांच्या शाळा प्रगत करण्यासाठी प्रेरणा देणारे व प्रत्यक्ष कार्य करणारे शिक्षक यांचा सन्मान आज शुक्रवार १ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे होत आहे.
कृष्णाजी पर्यटन स्थळ, मालखेड तलाव येथे हा भव्य सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, शिक्षण सभापती जयंतराव देशमुख, पं.स. सभापती छबुताई जाधव यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. सन्मान प्रेरणेचा या उपक्रमात जिल्हा परिषद व नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचा समावेश असून गुणवत्ता, समाज सहभाग, भौतिक सुविधा, बाह्य परिसर असे चार विभागामध्ये याचे मूल्यांकन केल्या गेले आहे. तालुक्यातील शाळामध्ये गेल्या तिन – चार वर्षापासून झपाट्याने बदल होत असून सर्व शाळा सर्वांगीण सुंदर बनण्यासाठी धड़पडत आहे. प्रत्येक शाळेत काही तरी वेगळपण जपल्या जात आहे, त्यामुळे एका शाळेपासुन दुसऱ्या शाळेला प्रेरणा मिळावी हा ही या उपक्रमाचा हेतु असल्याचे गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे तालुक्याचा हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यावर राबविणार असल्याची घोषणा शिक्षण सभापती यांनी यापूर्वीच केली आहे. तालुका १०० टक्के प्रगत करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे तालुक्यातील विषय साधन व्यक्ति यांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ति विशेष शिक्षक, व इतर सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे हे काल ३१ जानेवारी ला सेवानिवृत्त झाले. गेल्या ४ वर्षामध्ये अशोक इंगळे यांनी तालुक्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. तालुक्याला जिल्हास्तरावर नेहमीच नंबर वन ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचा ही या उपक्रमात गौरव होत आहे.
या उपक्रमात सहभागी सर्व शाळांना दर्जेदार प्रशस्ती पत्र दिल्या जाणार असून स्पर्धेत निवड झालेल्या उत्कृष्ट शाळांना रोख बक्षिसे ही मिळणार आहे. या सोबत वैयक्तिक बक्षीस सुध्दा शिक्षकांना देण्यात येणार आहे. समाज सहभागातुन हा सर्व खर्च करण्यात येणार आहे.