सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्याची शिवसेनेची मागणी
उस्मानाबाद / प्रतिनिधी दि. २ (प्रतिनिधी) – शासनाकडून आलेली मदत शेतकर्यांना देण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम तलाठ्यामारर्फत सध्या सुरु आहे. मात्र ही कागदपत्रे जमा करत असताना तलाठ्याकडून सक्तीने शेतसारा वसुली करण्यात येत आहे, तेव्हा ही सक्तीची सारा वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकार्याकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. शासनाच्या वतीने थोडीफार आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे. ही मदत शेतकर्यांपर्यंत पोहंचविण्यासाठी सध्या तलाठ्यामार्फत शेतकर्यांचे आधारकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरु आहे. मात्र ही कागदपत्रे जमा करीत असताना कांही तलाठ्याकडून सक्तीने सारा वसुलीही करण्यात येत आहे.
वास्तविक शासनाने संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करुन सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आगोदरच दुष्काळी परिस्थितीने अडचणीत सापडला असून शेतकर्याकडून सक्तीने सारा वसुली म्हणजे शेतकर्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तेव्हा ही सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्याकडे करण्यात आली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
सर निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिश सोमानी, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने, सोमनाथ गुरव, अनंत भक्ते, गुणवंत देशमुख, भिमा जाधव, आण्णासाहेब पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.
प्रतिक्रीया-
सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना शेतकर्यांकडून तलाठी सक्तीने शेतसारा वसूल करत आहे हे तात्काळ थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे .हा प्रकार म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळल्यासारखा आहे.हि वसुली तात्काळ नाही थांबवली तर शिवसेना शेतकर्याच्या पाठिशी खंबीर असून शिवसेनेकडुन आंदोलन करू- (शिवसेना तालुका प्रमुख सतिश सोमाणी)