पाकिस्तानने भारतावर आक्रमण करण्याविषयी चिथावणी देणार्‍या ‘फेसबुक पोस्ट’ प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल

0
669
गोवा – हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांनी ‘फेसबूक’वरून एक वादग्रस्त आणि देशविरोधी पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले, ‘‘मी आनंदी आहे कारण झी न्यूजच्या वृत्तानुसार भारतीय वायुसेनेने जसे पाकिस्तानात घुसून केवळ ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळांवर आक्रमण केले आणि तेथील सामान्य जनतेला हानी पोहोचवली नाही…. मी आशा करतो की, पाकिस्तान पण प्रत्युत्तर देण्यासंदर्भात यातून शिकून भारतातील सामान्य जनतेला काही नुकसान होऊ देणार नाही आणि तो केवळ रा.स्व. संघाच्या शाखा, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्या तळांनाच लक्ष्य करेल….’’ या प्रकरणी सनातन संस्थेचे अधिवक्ता नागेश जोशी यांनी काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांच्या विरोधात भा.दं.सं १२१, १२३, १५३-अ आणि ११८ अन् माहिती अन् तंत्रज्ञान कायदा यांच्या विविध कलमांखाली गोव्यातील फोंडा पोलीस ठाणे आणि गोवा सायबर क्राईम सेल, रायबंदर येथे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत अधिवक्ता नागेश जोशी यांनी ‘आरोपी नीरज भारती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, तसेच गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

या तक्रारीमध्ये अधिवक्ता जोशी पुढे म्हटले आहे की, आरोपी नीरज भारती यांनी उघडपणे पाक सैन्यदलाने भारतीय भूमीला लक्ष्य करावे, यासाठी काही मोक्याच्या ठिकाणांची माहिती या आक्षेपार्ह ‘पोस्ट’मध्ये दिली आहे. हिमाचल प्रदेशच्या या व्यक्तीने सनातन संस्थेच्या केंद्राला लक्ष्य करण्याचे सूचित करून गोवा राज्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. गोवा राज्य यापूर्वीच आतंकवाद्यांच्या रडारवर आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार भारतावर समुद्रामार्गे आक्रमण होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात युद्धजन्य स्थिती असून सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी प्राणत्याग करत आहेत. अशा निर्णायक क्षणी नीरज भारती यांनी पाक सैन्यदलाला भारतावर आक्रमण करण्यास चिथावणी देणारे लिखाण प्रसिद्ध करून गुन्हा केला आहे.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक संप्रदाय, अनेक संघटना, अनेक पक्ष आदी सुखाने नांदत असतांना यांतील भेदभावामुळे कोणीही भारतावर आक्रमण करण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही; मात्र पक्षीय राजकारणाचा अन् हिंदुत्वविरोधाचा अतिरेक करत आपण देशविरोधी लिखाण करत आहोत, याचे भान काँग्रेसवाल्यांना राहिलेले नाही, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या प्रकरणी म्हटले आहे. या प्रकरणी काँग्रेस पक्षाने नीरज भारती यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, अशी मागणीही श्री. राजहंस यांनी केली.