कुडाळ येथे २१ मार्चला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले, ‘‘नालासोपारा प्रकरणातील संशयित आरोपी वैभव राऊतशी फक्त एक समाजबांधव म्हणून माझा संबंध आहे. हा ४ मासांपूर्वीचा विषय आहे. वैभव राऊत हा भंडारी समाजाचा आहे. मी भंडारी समाजाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. समाजबांधव या नात्याने मी वैभव राऊतच्या सुटकेसाठी मोर्चा काढला होता. नालासोपारा येथील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्या समाजबांधवाची निर्दोष सुटका होणार आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने सोशल मीडियावर (सामाजिक प्रसारमाध्यमांतून) माझी अपकीर्ती करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. माझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही. सनातन संस्थेच्या कोणत्याही व्यासपिठावर (प्लॅटफॉर्मवर) मी गेलेलो नाही. सोशल मीडियावर अपकीर्ती करणार्यांनी याविषयी पुरावा द्यावा.’’