चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.)
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन सर्वच पक्षांच्या सभांना सुरूवात झाली आहे. परंतु आता काँग्रेससोबत असलेल्या मित्रपक्षांमध्ये घुसफुस सुरू झाली आहे. चांदूर रेल्वेत सोमवारी रात्री ८ वाजता झालेल्या काँग्रेसच्या सभा मंचावरून राष्ट्रवादी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते मंचावर दिसले नसुन मित्र पक्षांत नाराजीचा सुर असल्याचे दिसले.
वर्धा लोकसभा मतदार संघाची काँग्रेस पक्षाची तिकिट अधिवक्ता. चारूलता टोकस यांना मिळाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आता प्रचारास जोरदार सुरूवात केली आहे. सोमवारी दुपारी तालुक्यातील पळसखेड, आमला येथे सभा घेऊन रात्री ८ वाजता चांदूर रेल्वे शहरातील जुना मोटार स्टँड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. परंतु या सभेच्या मंचावर काँग्रेस सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते दिसुन आले नाही. तसेच कार्यकर्ते सुध्दा सभेला उपस्थित नव्हते. रिपाईचे कार्यकर्ते सुध्दा टोकस यांच्या प्रचारासाठी सक्रीय दिसत नाही आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारावर राष्ट्रवादीसह इतर मित्र पक्षांचा नाराजीचा सुर असल्यामुळे टोकस यांना ही निवडणुक कठीण जाण्याची शक्यता असुन याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकुणच म्हणजे आता राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्तेही टोकस यांचा प्रचार करण्यास इच्छुक दिसत नसल्याचे चित्र आहे.