चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
काँग्रेसच्या वर्धा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार अॅड. चारूलता टोकस यांनी सोमवारी (ता. १) चांदूर रेल्वे शहरातील मुख्य चौकात भर रस्त्यावर सभा घेऊन मुख्य चौकातुन जवळपास २ तास वाहतुकच बंद केली होती. त्यामुळे अशा चौकातील रस्त्याच्या मधात आयोजीत सभेला पोलीसांनी परवानगी दिलीच कशी असा सवाल निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सभांचा सपाटा सुरू झाला असतांना अनेक पक्षाचे उमेदवार चांदूर रेल्वे शहरात सभा घेत आहे. अनेक सभा ह्या चांदूर रेल्वेतील मुख्य चौकात होत असतांना एका बाजुने होतात. जेणेकरून बाजुन वाहतुक सुरू राहतील. परंतु सोमवारी तर याउलटच चित्र पहावयास मिळाले. काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांनी चांदूर रेल्वे शहरातील जुना मोटार स्टँड येथील जानवानी किराणा दुकानासमोरील रस्त्यावरच सभा घेतली. ह्या सभेत कार्यकर्त्यांना बसण्यासाठी थेट रस्त्यावरच सतरंज्या टाकण्यात आले होते. तर रस्त्याच्या दोन्ही आडव्या गाड्या लावुन रस्ता बंद करण्यात आला होता. या सभेमुळे कुऱ्हाला जाणारी वाहतुक पुर्णत: बंद झाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणावर मोठा पोलीस बंदोबस्त व वाहतुक पोलीस सुध्दा होते. मात्र त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी थोड्या प्रमाणात रस्ता मोकळा करण्याची तसदीही घेतली नाही. असे असले तरी अशा रस्त्यावरील सभांना पोलीस परवानगी देतातच कशी असा सवाल शहरवासी करीत असुन पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.