चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
यात्रेकरूंना पिण्याचे पाणी वाटण्याची सेवा करणाऱ्या एका युवकाचा टँकरच्या अपघातात मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील यात्रेत शनिवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे गुढीपाडव्या निमित्य दरवर्षी महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली यात्रा भरते. या यात्रेसाठी दुरदुरून भाविक भक्त येतात. अशातच यवतमाळ जिल्हातील नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील रहिवासी असलेले निखील हेमराज गोल्हर हे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सावंगा येथील नातेवाईका कडे यात्रेत सेवा देण्याकरीता आले होते. अशातच शुक्रवारी दुपारी यात्रेत टँकरने पाणी देत असतांना ट्रॅक्टरला लागलेला टँकर अचानक पलटी झाला. यामध्ये निखील गोल्हर हे जखमी झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहाय्याने निखीलला अमरावती इर्विनमध्ये नेण्यात आले. मात्र इर्विनमध्ये त्याला मृत घोषीत करण्यात आले. शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह माणिकवाडा या गावी नेण्यात आला. या घटनेमुळे यात्रेत शोककळा पसरली होती. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.