वर्धा लोकसभा मतदार संघात आज मतदान >< चांदूर रेल्वेतुन मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना - १७.२४ लाख मतदाता टाकणार वोट

0
1030
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
 वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज गुरूवारी होणार आहे. काल बुधवारी चांदूर रेल्वेतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन इलेक्शन पार्ट्या सकाळी रवाना झाल्या. वर्धा लोकसभा मतदार संघात एकुण १७.२४ लाख मतदार असुन यापैकी अमरावती जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यातील ५ लाख ९९ हजार १९३ मतदार आपला हक्क वर्धा लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे. यात १०५८ दिव्यांग मतदार देखील आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना मतदानासंदर्भातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अभिजीत नाईक व चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळपासुन साहित्य वाटपाला सुरूवात झाली होती. मतदारसंघांसाठी आवश्यक असणारे मतदानाचे साहित्य निवडणूक विभागाने मतदान केंद्राध्यक्षांकडे वाटप केले. अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, मतदान यादी, मतदान कक्ष,शाई, पेन, कागद आदी मतदान साहित्य घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी आपआपल्या कर्तव्याच्या ठिकाणी एस. टी. बस व निवडणुक विभागाच्या खाजगी चारचारी वाहनाने रवाना झाले. रवाना होण्यापुर्वी कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्याची पळताळणी आयटीआयच्या परिसरातच केली. पोलीस कर्मचारी सुध्दा रवाना झाले. यानंतर बुधवारी दुपारी चांदूर रेल्वेत झोनल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये सहाय्यक निवडणुक अधिकारी यांनी या अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले. यानंतर ३३ झोनल अधिकाऱ्यांनी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यातील ३७५ मतदान केंद्रावर जाऊन अधिकारी – कर्मचारी सर्व साहित्यासह पोहचले की नाही याबाबतची चौकशी करून ऑनलाईन रिपोर्टींग केले. गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मतदानासाठी गुरूवारी सुटी सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. परदाशीन महिला (बुरखा परिधान केलेल्या) मतदारांची ओळख करण्यासाठी मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या गेली आहे.
यांचे भाग्य होणार मतपेटीत बंद
  प्रविण गाढवे (आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी), राजेश बालपांडे (अपक्ष), अरविंद लिल्होरे (अपक्ष), चारुलता टोकस (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), रामदास तडस (भारतीय जनता पक्ष), अॅड. धनराज वंजारी
 (वंचित बहुजन आघाडी), शैलेशकुमार अग्रवाल (बहुजन समाज पार्टी) , ज्ञानेश वाकुडकर (लोकजागर पार्टी), नंदकिशोर सागर (मोरे) (अपक्ष), झित्रुजी बोरुटकर (अपक्ष), गणेश लादे (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया),  जगदिश वानखडे (बहुजन मुक्ती पार्टी), उमेश नेवारे (अपक्ष) व अॅड. भास्कर नेवारे (अपक्ष) या १४ उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद होणार आहे.