अंबादास ठाकरे आहे मृत शेतकऱ्याचे नाव
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे गळफास लावुन एका कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतात आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १७) दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. अंबादास गणाजी ठाकरे (५२) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्तमाहितीनुसार, मालखेड (रेल्वे) येथील शेतकरी मृतक अंबादास गणाजी ठाकरे हे मंगळवार रात्री घरातुन निघून गेल्यानंतर रात्री घरी परतलेच नव्हते. घरच्यांनी शोधाशोध घेतल्यानंतरही कुठेही आढळून आले नाही. बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान बकऱ्या चारणाऱ्याला त्यांचा लटकलेला मृतदेह दिसला. अंबादास ठाकरे यांनी गावापासुन अंदाजे १ कि.मी. अंतरावर असलेल्या स्वत:च्या शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याचे समोर आले. अंबादास ठाकरे यांच्याकडे ५ एकर शेती असुन त्यांच्यावर बँक ऑफ इंडिया, शाखा – मालखेडचे सन २०१८ मधील दीड लाखाचे कर्ज होते. याच कर्जाच्या विवंचनेतुन आत्महत्या केली असावी असा तर्क गावात लावण्यात येत होता. अंबादास ठाकरे यांना २ विवाहीत मुली असुन १ अविवाहीत मुलगा आहे. मुलगा खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम करतो. त्यांच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.