घुईखेड – (वार्ताहर)
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील शनिवारपासुन गेलेली लाईन तब्बल ३७ तासानंतर सुरू झाली असुन अखेर काही नागरीकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अर्ध्या गावाचा विद्युत पुरवठा अजुनही खंडीत होता. घुईखेडच्या वीज वितरण कंपनीत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे कामाला गती नसल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले.
प्राप्तमाहितीनुसार घुईखेड गावातील विद्युत पुरवठा भारनियमामुळे शनिवारी सकाळी ६.३० वाजता गेली होती. त्यानंतर जि.प. शाळेजवळील रोहीत्रामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा सुरू झालेला नव्हता. अशातच शनिवारी दुपारी ३ वाजता वादळी वारा आल्यामुळे विद्युत पोल वाकले व काही विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे शनिवारी रात्रभर व रविवारी रात्री ७.४५ पर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. तब्बल ३७ तासानंतर घुईखेडचा विद्युत पुरवठा सुरू झाला असुन नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र एवढ्या वेळापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्या गावाचा विद्युत पुरवठा वृत्तलिहोस्तर बंदच होता. घुईखेड येथील विज वितरण कंपनीत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे काम कासवगतीने होत असुन याचा त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याचे मत काही नागरीकांनी व्यक्त केले. तरी रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.