आमला (विश्वेश्वर) मध्ये पोहोचली दुष्काळाची झळ
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या वाळलेल्या संत्रा बागांचा व अति उष्णतेमुळे गळालेल्या आंबिया बहाराचा सर्वे लवकरात लवकर करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) या मंडळाचा समावेश होता. चांदूर रेल्वे तालुक्यात दुष्काळाची सर्वाधिक झळ आमला (विश्वेश्वर) गावाला पोहचली आहे. यामुळे या वर्षी जवळजवळ ६० टक्के बागा वाळलेल्या आहेत. तसेच थोड्याफार ज्या संत्रा बागा वाचल्या त्या अतिउष्णतेमुळे आंबिया बहार पूर्ण गळालेला आहे. बागा वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना करून सुद्धा परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांनी मागील वर्षी पिकांचा विमा काढलेला असतांना त्या विम्याचा लाभ तात्काळ मिळावा अशी मागणी आमला (विश्वेश्वर) येथील उत्तमराव खेकडे, शालिग्राम खेकडे, गणेश डोंगरे, सुरेंद्र बेंबारे, अविनाश बकाले, राजेंद्र वाढोणकर, ज्ञानेश्वर बकाले, सुनील खेरडे, ज्ञानेश्वर मालखेडे, अरविंद बकाले , विलास बकाले, राजू डेरे, अभिजीत मालखेडे, ज्योती यावले, मंदा बकाले, रामराव बकाले, मंदा भोंगे, साहेबराव केने, अशोक बकाले, निलेश कनोजे, प्रकाश केने, प्रशांत केने, रवींद्र शिंगाणे, धनंजय मडघे, दिपक केने आदींनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.