निकामी बॉम्ब समजून हाताळताना स्फोट.. खारेकर्जुने येथील दोन जण मृत्युमुखी..

0
656

अहमदनगर :-

अहमदनगर येथील एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला स्फोट होऊन यामध्ये खारे कर्जुने गावातील दोन मृत्युमुखी पडल्याची झाल्याची घटना घडली आहे. लष्कराने वापरलेला बॉम्ब निकामी समजून या दोन जणांनी त्यातून शिसे काढण्याचा प्रयत्न करत असताना बॉम्ब जिवंत असल्याने त्याचा स्फोट झाला आणि त्यात या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.

या घटनेमध्ये अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (वय 32, राहणार खारे कर्जुने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांची नावे आहेत. नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्कराचे ठाणे आहे. के के रेंज असे या लष्करी केंद्राचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमाराला साधारण साडे अकराच्या वेळेला हे दोन जण बहुधा या ठिकाणी असलेले भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा स्फोट झाला स्फोट एवढा भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तत्काळ लष्करातील अधिकारी तसेच नागरिक या ठिकाणी गोळा झाले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान नगर जिल्ह्यातील के के रेंज मध्ये याअगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा झालेल्या होत्या. या ठिकाणी लष्कराचा सराव मोठ्या प्रमाणात चालतो. आजूबाजूच्या गावाचे या ठिकाणी राहत असतात, या ठिकाणी स्फोट झाल्यानंतर तेथे पडणारे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जात असतात. त्या सुमाराला हे दोघेजण त्याच पद्धतीने गेले असावे अशी माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले आहे.