अमरावती :- वरुड येथील ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवण केंद्राचे श्रेणीवर्धन करुन रक्तपेढी व रक्त विलगीकरण केंद्र स्थापन करण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला.
या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात आदिवासी समाजाच्या लोकवस्तीसह सुमारे 35 ते 40 गावे येतात. येथून नागपूर व अमरावती या शहरांचे अंतर अनुक्रमे 105 व 90 कि.मी. आहे. त्यामुळे येथे रक्तपेढी असणे आवश्यक होते. ही रक्तपेढी व रक्त विलगीकरण केंद्र स्थापन करण्यास इमारतीसह 2 कोटी 33 लाख इतका अंदाजे खर्च आहे. त्याला आरोग्य सेवा सहसंचालक राज्यस्तर यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आला. त्यास तत्वत: मंजूरी देण्यात आली आहे.
या रक्तपेढीचा वरुड-मोर्शी क्षेत्रातील रुग्णांना फायदा होणार आहे. प्रसृती, शस्त्रक्रिया आदींमुळे या परिसरात रक्तपेढीची गरज होती. त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू, मातामृत्यू आदी प्रमाण कमी व्हावे यासाठी रक्तपेढी असणे आवश्यक होते. रक्तपेढीसह रक्त विलगीकरण केंद्र ही असल्याने एकाच ठिकाणी सुविधा मिळणार आहेत.