सततच्या नापीकीमुळे त्रस्त
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने सततच्या नापीकीला कंटाळून निंबाच्या झाडाला गळफास लावुन जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी उघडकीस आली. विजय नारायणराव शिंदे (६०) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
सावंगी संगम येथील शेतकरी विजय शिंदे यांच्याकडे १० एकर शेती असुन ते शेतात जाण्यासाठी गुरूवारी पहाटे ५.३० वाजता घरून निघाले होते. परंतु शेतात जात असतांना मधातच गावातील स्मशानभूमीला लागून असलेल्या ई – क्लासच्या जमिनीवरील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सततची नापीकी व डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे याच्या विवंचनेतुन विजय शिंदे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याच बाब त्यांचे चुलत भाऊ दिनकर नथ्थुजी शिंदे यांना माहित होताच त्यांनी गावातील पोलीस पाटील सुरेंद्र शिंदे यांना दिली. यानंतर पोलीस पाटील यांनी सदर माहिती चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला देताच ठाणेदार संतोष भंडारे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. विजय शिंदे यांच्यावर जवळपास दीड लाखांचे कर्ज होते. त्यांच्यामागे वडील, दोन भाऊ, विवाहीत दोन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. एएसआय संजय राठोड व कॉन्स्टेबल आशिष राऊत यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.