मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – आपल्या देशात पुर्वी पासुन अठरा पगड जाती आहेत असे म्हणतात. परंतु, इंग्रज देशात मोटार कार घेऊन काय आले तेच एका नवीन ड्रायवर नावाच्या जातीची निर्मिती पण करून गेले. याच ड्रायवरांच्या मागण्यांबाबत अनेक निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही होत नाही याअनुषंगाने दि.13/09/2019 पासुन औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्या मान्य होऊ पर्यंत माघार नाही असे आमरण उपोषण करणार असल्याचे माहिती जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष संजय हाळनोर यांनी दिली आहे. यात राज्यातील अनेक ड्रायवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी हाळनोर म्हणाले की, मागील जवळपास 15 ते 20 वर्षांपासून गावातील सरपंचापासून ते शहरातील नगरसेवकां पर्यंत व पंचायत समिती, जिल्हा परिषद अध्यक्षांपासुन तर थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत सर्वच गाडी चालवायला ड्रायवर ठेवतात. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ड्रायवर हा दळण वळणाचा महामेरू आहे. मातेला बाळाची चाहुल लागताच चेकअपसाठी हॉस्पिटलला जाणेसाठी ड्रायवरची गरज तर मेल्या नंतर थेट स्मशानात न्यायला पण आज काल ड्रायवरच लागतो. एकंदरीत सुखात पण व दुख:त पण ड्रायवर शिवाय पान हालत नाही. असे असून देखील आज परिस्थिती अशी आहे की, कुत्र्याला इज्जत आहे परंतु, ड्रायवरला इज्जत नाही. 72 वर्षा पुर्वी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात अनेक जाती मागास होत्या परंतु, आज घडीला आपल्या देशात वंचित, शोषित, मागास जर कोणती जात असेल तर ती जात आहे ड्रायवर जात ! त्या ड्रायवर जातीचे कष्ट किती व कष्टाच्या मोबदल्यात ड्रायवरला दिला जाणारा मोबदला किती ? या ड्रायवर ला ना काळ, ना वेळ, ना सोई, ना सुविधा, ना सवलती ना संरक्षण. क्वचित पोलीस, वकील, पत्रकार, डॉक्टर यांना जर पब्लिकने मारहान केली तर पब्लिकवर गुन्हे दाखल होतात. परंतु, जो दळण वळणाचा महानायक आहे तो रोज कुठे, ना कुठे मार खातो आहे. परंतु त्याची कुठे ना दाद ना फिर्याद. अशी दयनीय अवस्था आहे. देश स्वतंत्र झाल्या पासुन राजकीय गादी उबवायला मिळावी म्हणून तेव्हा पासुनच विविध पक्ष विविध जातींना मतासाठी विविध पँकेजेस, आरक्षणे, आर्थिक महामंडळाची दाणे देऊन आपापल्या परीने त्या – त्या जाती समुदयाचे भले करु लागले. चांगली गोष्ट आहे. ज्या – ज्या राजकीय पक्षांनी ज्या – ज्या मागास जातीचा विचार केला व त्या – त्या जातींना आरक्षण देऊन, आर्थिक महामंडळ देऊन जमेल त्या – त्या अनुषंगाने प्रगति पथावर आणले त्या सर्वच राजकीय पक्षाचे आम्ही अभिनंदन करतो.
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था सांगू इच्छिते की, एक वाहन चालक सापाला वाचवण्याचे कसोशिने प्रयत्न करतो हो, तो माणसाला कसा मारेल ? आम्ही जनतेला आव्हान करतो की, अपघात समयी ड्रायवरला सहकार्य करा. अपघात ग्रस्त व्यक्तीस त्याचेच गाडीत टाकुन अंबुलेसला फोन करा, अर्धे अंतर अंबुलेस कमी करेल व अर्धे अंतर अपघाती ड्रायवर कमी करेल. वेळवर औषधोपचार मिळाल्यामुळे मरणारी व्यक्ती मरणार नाही. आपण अपघात ग्रस्त चालकास मारहाण करता म्हणून त्या भिती पोटी तो ड्रायवर पळुन जातो. प्रसंगी दुसरे वाहन वेळेवर मिळत नाही. जेणे करून वेळेवर उपचार न झाल्यामुळे न मरणारा व्यक्ती मरतो व ती मरणारी व्यक्ती ड्रायवरला मारहाण करणाऱ्याची कोणीच नसते. ड्रायवरला होणाऱ्या मारहानीवर अंकुश यावा या हेतुने मागील दोन ते अडीच वर्षांपासून आम्ही, आमच्या संस्थेतील सदस्य व पदाधिकारी यांनी राज्यभरातील तब्बल 20 आजी – माजी आमदारा पासुन तर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यापर्यंत निवेदने दिलेली आहेत. परंतु, आजतागायत ड्रायवरच्या मुद्द्याला कोणीच हात घातला नाही. आज दि. 23/08/2019 पासुन दि.12/09/2019 पर्यंत ड्रायवर हिताच्या संस्थेच्या निवेदनातील मागण्यांच्या जर सरकार दरबारी विचार केला गेला नाही. तर दि.13/09/2019 पासुन मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणास बसणार आहे. त्या आषयाचे दि. 22/08/2019 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद तसेच सिटी चौक पोलीस स्टेशन निरक्षक औरंगाबाद यांना रीतसर निवेदन देण्यात आलेले आहेत. उपोषण काळात उपोषण कर्त्यांच्या जीवितास धोका उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल अशा कठोर शब्दात ठणकावून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष संजय हाळनोर यांनी इशारा दिला आहे.
काय आहेत मागण्या
01) वाहन चालकास पब्लिकने अथवा सरकारी कर्मचाऱ्याने मारहाण केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.
02) आयुष्यमान भारत योजने मधे वाहन चालकांच्या परीवारास समाविष्ट करण्यात यावे.
03) असंघटित कामगार व नोंदीत बांधकाम मजुरास दिल्या जाणाऱ्या योजना मध्ये वाहन चालकास समाविष्ट करण्यात यावे.
04) वाहन चालकाच्या पाल्यास स्वतंत्र वसतीग्रहाची तसेच मोफत शिक्षणाची सोय करण्यात यावी.
05) वाहन चालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास तात्काळ 25 लाखाची व 100 % अपंगत्व आल्यास 10 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी.
06) पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वाहन चालकास विनामुल्य घरकुल देण्यात यावेत.
07) वाहन चालकास पेंन्सन योजनेत समाविष्ट करण्यात यावे.
08) क्रुझर ह्या गाडीस 11+1 चे परमीट देण्यात यावे.
09) वाहन चालकाच्या सर्वांगीण विकासाठी वाहन चालकास स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी.