चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

0
484

भारतीय कम्युनिस्ट पक्ष – किसान सभेचे आयोजन

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
    महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या १ सप्टेंबर राष्ट्रीय शेतकरी मागणी दिनाच्या निमित्ताने सोमवारी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धरणे दिले. सत्ताधाऱ्यांकडे आरपार सत्ता असतांना देखील शेतकरी आत्महत्या “जैसे थे” आहे. संपूर्ण कर्जमाफीस सपशेल नकार, कृषी बजेटचा सर्व पैसा पिक विमा कंपन्यांच्या घशात ओतला, उभा संत्रा पाण्याविना वाळला तरी सरकार हालले नाही. अर्थात अख्खे सरकार संवेदनाशून्य आहे असा आरोप करून आपल्या मागण्या घेऊन शेतकरी मैदानात आले होते.
      डॉ. स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट शासकीय भावाची हमी द्या, शासकीय खरेदी केंद्रे वेळेवर सुरू करा, शेतकऱ्यांना सरसकट विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकरी – शेतमजूर व ग्रामीण कारागिरांना दहा हजार रुपये दरमहा पेन्शन द्या,  पिक विमा क्षेत्रात राज्य सरकारची शासकीय कंपनी सुरू करा, खरीप सन २०१७-१८ व २०१८-१९ या दुष्काळी काळात १०० टक्के पिक विमा नुकसान भरपाई द्या, वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा पिक विमा योजनेत समावेश करा, पिक विमा तक्रार अर्जाची तालुकास्तरावर जनसुनावणी करा, पाथरगाव उपसा जलसिंचन योजनेची त्वरित कामे सुरू करावी आदी मागण्या सरकारला केल्या आहेत. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर धम्माजी खडसे यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करीत शेती जीवनाचे विश्व आपल्या क्रांतिकारी गीतातून आंदोलना समक्ष मांडले. या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. शिवाजीराव देशमुख, राज्य सचिव अशोक सोनारकर, जिल्हाध्यक्ष विजय रोडगे, भाकप जिल्हा सचिव सुनील मेटकर, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जोशी, धम्माजी खडसे, कैलास ठाकरे यांनी केले होते. सदर आंदोलनाला आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी, वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद परगने, जनता दल (सेक्युलर) चे गौरव सव्वालाखे यांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पंडितराव ढोके, हरिदास राजगिरे, विनोद वैद्य,  माधव ढोके, दत्ता देशमुख, रमेश पाटमासे, किशोर काळे, शेखर बद्रे,  डॉ प्रभुराज इंगळे, भीमराव बेराड, गोविंदराव ढेंगे, निवृत्ती रवाळे, संदीप ढोणे, भगवान वाघ, विनोद तरेकार, उमेश जोशी, अनील काळमेघ, राजू मनोहरे, प्रफुल देशमुख, भाऊराव वहाणे, विश्वास कांबळे आदीसह शेकडोंची उपस्थिती होती.