अमरावती- : अद्ययावत तंत्रज्ञान ग्रामीण भागासह सर्वदूर पोहोचविण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रेल्वे स्थानकावरील फ्री वाय फाय सेवेचा लाभ प्रवाश्यांसह विद्यार्थ्यांना होईल. येथे विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी व वाचन कक्षही सुरू करावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे दिले.
वरुड ऑरेंज सिटी रेल्वे स्टेशनवर रेल वायरच्या फ्री वायफाय सेवेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
कृषी उद्योग महामंडळाचे संचालक विजय श्रीराव, राजकुमार राऊत, नगरसेवक देवेंद्र बोडखे, संतोष निमघरे, जगदीश उपाध्याय, प्रवीण कुंडलकर, नीलकंठ आंडे, सुनील क्षीरसागर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, प्रत्येकाला घर, प्रत्येकाला काम, भक्कम पायाभूत सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञानाची सर्वत्र उपलब्धता याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरु आहे. स्थानकातून व्यावसायिक, नोकरदार याप्रमाणे विद्यार्थीसुध्दा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे स्थानकात वाचन कक्ष व ई लायब्ररी सुरू करावी. एक नवीन उपक्रम यानिमित्त सुरू होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी रेल्वे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांसह प्रवासीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.