वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचार्‍यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच  

0
1145
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ: अमोल सूर्यवंशी

*_13 महिन्यांपासून पगार नाही, 18 महिन्यापासून पी.एफ. भरला नाही_*

परळी वै. दि.19…… बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 100 च्या वर कर्मचारी उपोषणाला बसले असतानाही कारखाना प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान उपोषणामध्ये 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे बुथ एजंट असल्याचा आरोप करणार्‍या संचालक शिवाजीराव गुट्टे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आम्ही 3 नव्हे तर 100 कर्मचारी उपोषणाला बसलो आहोत,  एखादा दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असला तरी उर्वरित 98 भाजपाचा प्रचार करीत असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि कारखान्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडणार का ? असा सवाल केला आहे.

दरम्यान या कर्मचार्‍यांचे आर्थिक वर्ष 2017-18 पासून अंशदानाची रक्कम भरलेली नाही, मागील 13 महिन्यांपासून या कर्मचार्‍यांना पगार मिळालेला नाही, 18 महिन्यांपासून त्यांचा पी.एफ. जमा केला नाही आणि 2 वर्षांपासून रेटेन्शन अलाऊंस मिळालेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कारखाना प्रशासन शेतकर्‍यांपाठोपाठ ज्यांच्या जीवावर कारखाना चालतो त्या कर्मचार्‍यांची ही पिवळणूक, लूट आणि अडवणूक करीत असल्याचा ही आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

*त्या कर्मचार्‍यांच्या अ‍ॅडव्हान्स ची चौकशी करा*

दरम्यान कारखाना प्रशासन दावा करत असलेल्या आणि मोठी थकबाकी असलेल्या 3 कर्मचार्‍यांची चौकशी करा. या कर्मचार्‍यांना अ‍ॅडव्हान्स का आणि कसा दिला ? आणि ते पैसे स्वतः च्याच मर्जीतील लोकांना नियमबाह्यरित्या कसे वाटप केले ? याचीही चौकशी होऊन जाऊ द्या. कारखान्याचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही, असे ही कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.