ना. पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथच्या कर्मचा-यांना दिला सर्व थकीत पगार

0
770

वैद्यनाथचे उपोषण हा राजकीय स्टंट ; विरोधकांवर टीकास्त्र

कर्मचाऱ्यांना दाखवली एकजूट! म्हणाले, ताईसाहेब, आम्ही तुमच्या पाठिशी

प्रतिनिधी – दिपक गित्ते

परळी दि. २३ – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी कारखाना कर्मचाऱ्यांना सर्व थकीत पगार दिला आहे, याबद्दल कर्मचाऱ्यांनी आज गोपीनाथ गडावर त्यांची प्रत्यक्ष भेटून आभार मानले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला. दरम्यान, वैद्यनाथचे उपोषण हा राजकीय स्टंट असून वैद्यनाथच्या विरोधात काड्या करणारे विरोधक एकीकडे मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात विघ्न आणतात अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात असुनही कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना सर्व थकीत पगाराची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. मुळात दोन महिन्यापूर्वी कारखान्यात बैठक झाली होती, कर्मचारी युनियनला पंकजाताई मुंडे यांनी सप्टेंबर अखेर पर्यंत आपले प्रश्न निकालात काढेल असा शब्द दिला होता, त्याप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आता पैसे मिळणार हे स्पष्ट झाल्यावर उपोषणाला बसण्याचा घाट कारखान्यातील राष्ट्रवादी धार्जिण्या कर्मचाऱ्यांनी नेत्यांशी संगनमत करुन घातला. यातील कांही लोकांचे कारखान्याकडे देणे आहे, शिवाय बहुतेक लोक राष्ट्रवादीचे बुथ प्रमुख आहेत. सर्व कर्मचारी एकीकडे आणि 25-30 कर्मचारी उपोषणात असे चित्र होते. कारखान्यातील सर्व कर्मचा-यांनी आपले उपोषणाला समर्थन नाही असे लेखी दिले आहे तरीही काही जण राजकीय दबावापोटी उपोषणाला बसले असल्याचे त्या म्हणाल्या. साखर उद्योग सध्या अडचणीत आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना आर्थिक संकटात आहे, परंतु मी जमीन गहाण ठेवून पैसा उभा केला. कारखाना हा मी कुटूंबासारखा साभांळला आहे. कर्मचारी हे माझे कुटुंबीय आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. ज्यांना एकही युनिट उभा करता आले नाही, ज्यांनी तोडपाणीचे राजकारण केले त्यांनी कारखान्यातील गरीब कर्मचाऱ्यांच्या चुलीत पाणी ओतू नये असे त्या म्हणाल्या.

*हा तर षडयंत्राचा भाग*
—————————
कारखान्यामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. शेतकरी आणि मजुर आर्थिक संपन्न झाला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला कारखाना मी सक्षमपणे चालवत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. अडचणीत असलेला कारखाना मी पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात विरोधक अडचणी आणत आहेत असा आरोप ना. पंकजाताई मुंडे यांनी केला आहे.सध्या बंद पडलेल्या संत जगमित्र सहकारी सूतगिरणीतील किती कर्मचा-यांचे संसार उद्ध्वस्त झाले, किती चेक बाऊन्स झाले, आणि न्यायालयात किती खटले सुरू आहेत हे जगजाहीर आहे असे कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे यावेळी म्हणाले
यावेळी कारखान्याचे संचालक व्यंकटराव कराड, शामराव आपेट व कार्यकारी संचालक तसेच कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.