तातडीने पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नितीन ढाकणे
बीड,- बीड जिल्हयातील विविध महसूल मंडळनिहाय स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला असून शासन निर्णयानूसार पंचनामे करुन अतिवृष्टी झालेल्या जिल्हयातील महसूल मंडळ आणि गावांमध्ये तातडिने कार्यवाही करण्याचे आदेश तहसिलदार यांना दिले आहेत. बीड जिल्हयातील सरासरीच्या तुलनेत 93.52 टक्के पाऊस झाला असून जिल्हयातील सरासरी एकूण प्रमाण 623.2 मि.मी आहे.
ऑक्टोबर,2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचे निर्दशनास आले आहे. या नुकसानीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्याचे निदेश मा.मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. ही बाब विचारात घेता ज्या महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे अशा महसुली मंडळामधील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी हे निर्देश दिले आहेत.