*अवकाळी पाऊसामुळे नुकसान भरपाईसाठी पाच हजार रूपये तातडीची मदत – परिवहन मंत्री दिवाकर रावते*

0
1195
Google search engine
Google search engine

*अकोला, अमरावती जिल्ह्यात पाहणी

*तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

अमरावती: राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पाच हजार रूपयांची तातडीची मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिली.

श्री. रावते यांनी आज अकोला, अमरावती जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. बैठकीला आमदार श्रीकांत देशपांडे, गोपिकिशन बाजोरिया, डॉ. संजय रायमूलकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, मदत व पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, कृषि सहसंचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

राज्यातील अवकाळी पाऊसामुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी श्री. रावते यांनी आज दिवसभर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतांमध्ये जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही मदत मिळण्यास काही कालावधी लागणार असल्याने शासनातर्फे तातडीची मदत म्हणून पाच हजार रूपये प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

विदर्भातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई तातडीने होण्यासाठी विमा कंपन्यांनी तात्काळ मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पिक विम्यासोबतच पिक विमा काढलेला नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत व्हावी, यासाठी समितीला निवेदन सादर करण्यात येईल. तसेच अशा शेतकऱ्यांना पिकविम्याप्रमाणेच नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. रावते यांनी सांगितले.