चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे तालुका कृषी कार्यालय मार्फत पिक विमा प्रस्ताव अजून पर्यंत विमा कंपनीला पाठविलाच नसल्याची माहिती नगरसेवक बच्चु वानरे यांच्या माध्यमातुन पुढे आली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे संपुर्ण महाराष्ट्रात तथा चांदूर रेल्वे तालुक्यात हातात येणा-या सोयाबीन पीकाचे अतोनात नुकसान होऊन शेतक-यांना आर्थिक फटका बसला. त्यानंतर प्रशासनाने अत्यंत तातडीने सर्वे करून शेतक-यास नुकसान भरपाई जाहीर झाली. अश्यातच तालुक्यातील हजारो शेतक-यांनी पंतप्रधान पिक विमा काढला. त्यांना तर तत्काळ विमा रक्कम विमा कंपनी ने शेतक-यांच्या खात्यात जमा करायला हवा होता. जेणेकरून रब्बी पिक घेण्याकरीता ते पैसे हतबल झालेल्या शेतक-यांच्या कामी आले असते. परंतू अद्यापपर्यंतही पिक विमा प्रस्ताव चांदूर रेल्वे तालुका कृषी कार्यालयातर्फे विमा कंपनीला पाठविण्यात आला नसल्याचे समजते. त्यामुळे शेतक-यांची चेष्ठाच सूरू आहे. अगोदरच दुष्काळाने होरपळलेला शेतकरी हक्काच्या मदतीची वाट पाहत आहे व पूढील हंगामाचे पिक कसे घ्यावे या विवंचनेत आहे.
मी पिक विमा कंपनीच्या अधिकारी यांना फोनवर विचारणा केली असता अजून पर्यंत तालुका कृषी कार्यालय मार्फत प्रस्ताव आम्हाला सादरच झाला नाही असे त्यांनी म्हटले आणि नंतर मी चांदूर रेल्वेच्या तालुका कृषी अधिकारी यांना फोन लावला असता अजून पर्यंत सर्वे पूर्ण व्हायचा आहे, तीन ते चार दिवसात सर्वे पूर्ण करून विमा प्रस्ताव पाठवतो अशी माहिती दिल्याचे नगरसेवक बच्चू वानरे यांनी सांगितले.