आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या शासनाकडे !
रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यात खरीप हंगामात सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाऊस व कीडरोगांमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. यासाठीच दिवसरात्र मेहनत आणि रक्ताचे पाणी करुन व शिल्लक असलेली जमापुंजी रब्बी पिकासाठी खर्ची घातली.यातून चांगले उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सुदैवाने पिके देखील चांगली आली होती. मात्र अवकाळी पाऊस व गुरूवार (दि.०२) जानेवारीला सकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या या सर्व आशांवर पाणी फेरल्या गेले. भरुन आलेली शेतातील पिके गारपीट, वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर गारपिटीचा उतारा चढल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली आल्याचे चित्र आहे .
नवीन वर्षात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे संत्रा , मोसंबी , तूर , कपाशी , चना , गहू , आदी शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावुन घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा , तूर , कपाशी ,चना , गहू , पिकांची पाहणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई ही शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडुन लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली. यावेळी मोर्शी तालुक्यातील परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
*_आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडल्या शासनाकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा !_*
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी .
संत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाची वृद्धी करण्यात यावी.
संत्रासाठी गाव तेथे कोल्ड स्टोरेज निर्माण करावे ,
दर्जेदार संत्रा उत्पन्न करण्यासाठी संत्राचा सुधारित जाती निर्माण करण्यात याव्या,
संत्रा निर्यातीकरिता आवश्यक त्या सोई सुविधा निर्माण करण्यात याव्या,
बांगलादेशमध्ये सर्वात जास्त नागपुरी संत्रा निर्यात होतो त्याकरिता पणन महामंडळाचे कार्यालय बांगलादेशमध्ये सुरू करावे,
सार्क देशामध्ये संत्रा निर्यातीकरिता प्रयत्न करावे,
संत्रा ज्यूस प्रक्रिया कारखाने निर्माण करण्यात यावे,
एन आर सी सी नागपूर येथे संत्राची आदर्श संत्रा बाग निर्माण करावी ,
चांगल्या प्रकारच्या जातिवंत संत्रा कलमा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात याव्या.
एन आर सी सी तर्फे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे.
संत्राचा खप वाढविण्याच्या दृष्टीने संत्राचे आहारातील महत्व व पोषण मूल्य जनतेसमोर आणून जनजागृती करणे ,
उत्पादक ते ग्राहक संत्रा विक्री करून जनजागृती करणे,
प्रदर्शन, चर्चासत्र, माहिती फलक, इत्यादी बाबींसाठी जाहिरात व उपभोक्ता जनजागृती अभियान राबवने.
दूरदर्शन व आकाशवाणी द्वारे संत्राची जाहिरात करावी, तसेच संत्राचा खप वाढविण्यासाठी संत्रा ज्यूस चा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा,
एस टी स्टँड व रेल्वे स्टेशनला संत्रा विक्रीसाठी, संत्रा ज्यूस पार्लरसाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी यासह संत्रा उत्पादकांच्या या वीविध अडचणी व मागण्या आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे मांडल्या .