अमरावती | ‘जलयुक्त शिवार’ या प्रकल्पाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली चांगली काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.
जलयुक्त शिवार योजना थांबवणं. त्याला स्थगिती देणे, निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवणारी आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
आम्ही शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती देऊन त्यांना चिंतेत टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे, असा आरोपही बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक कामांना स्थगिती दिली. आरे कारशेड, बुलेट ट्रेन याशिवाय फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेलाही ठाकरेंनी ब्रेक दिला.