राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या राहुटी उपक्रम ला भरपूर प्रतिसाद
जनसामान्य चे काम गावातच,एकाच ठिकाणी सर्व शासकीय दाखले वितरित
अमरावती/
सर्वसामान्य जनतेची कामे विहित मुदतीत एकाच ठिकाणी गतीने होण्यासाठी ग्रामीण स्तरावर राहुटी हा उपक्रम जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे कडू यांच्या हस्ते राहुटी उपक्रमाचा शुभारंभ झाला. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील गोरगरीब व गरजूंना द्यावा, अशा सूचना सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले.
शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात पुरवठा विभाग, विद्युत विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, आरोग्य विभाग, संजय गांधी/ र्शावण बाळ, तलाठी विभाग, तहसील विभाग आदी विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी सरपंच अविनाश बदकुले, संजय झिंगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या राहुटी शिबिरात शिधापत्रिका काढणे, वीज जोडणी अर्ज, जमिनीचा फेरफार, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, र्शावण बाळ योजना, जातीचे दाखले तयार करणे, अतिक्रमण नियमानुकूल करुन जमीनीचे पट्टे वाटप करणे, अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण, वैद्यकीय मदतीचे अर्ज भरणे, आरोग्य व महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज भरुन घेणे आदी लोकहिताची कामे केली जात असून, पंधरा दिवसात संबंधित विभागाकडून योजनांचा लाभ प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते अतवृष्टीमुळे घराची पडझड झालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून गुणवंत विद्यार्थींनींना बक्षीस वितरण सुध्दा करण्यात आले. कडू म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडित कामे वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी गावपातळीवर राहुटी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने घेऊन पंधरा दिवसात प्रकरण निकाली काढण्यासाठी राहुटी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत आहे. नागरिकांनी राहुटीच्या ठिकाणी येऊन आपल्याला आवश्यक असणारे दाखले, महसूल किंवा इतर शासकीय विभागाशी निगडित सेवा संदभार्तील लाभ मिळविण्यासाठी रीतसर अर्ज करावा. अर्ज केल्यावर पंधरा दिवसात त्यांना घरपोच दाखले व इतर सेवा कागदपत्रे वाटप केले जाईल. दुर्धर आजारापासून त्रस्त असणार्या रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.सोमवारखेडा येथील २७0 कुटूंबांचे अतिक्रमण नियमानुकूल केल्याचे जमीनीचे पट्टे वाटप प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. गावातील सहाशे गरजू कुटुंबांना नवीन शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. राहुटीच्या माध्यमातून अनेक अडचणी दूर होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या चेहर्यावर हसू फुलले होते. त्यांच्याशी राज्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचे काम अनेक दिवसानंतर झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.