हरिपाठ हरी कीर्तनाने महोत्सवात रंग
प्रगटदिन महोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था
अकोटःसंतोष विणके
ध्यान हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे देवाचे नाम गात राहिल्यास देव जवळ येते दूध हे जसे धनाचे प्रतीक आहे आणि लोणी हे आनंदाचे प्रतीक आहे आनंद हे साधन आहे साध्य नाही.म्हणुनच देव नामाचा आनंद देणारी श्रीमद् भागवत कथा हे आनंद विज्ञान आहे असे उद्बोधन तपोनिष्ठ स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले ते संत गजानन महाराज संस्थान (विहीर) शांतीवन अमृत तीर्थ येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना केले
पुढे बोलताना ते म्हणाले आठवण देवाची काढावी काम आपलं करावं. आपले सण आणि उत्सव आपल्याला कायम उत्साही ठेवतात हा देश उत्सवांचा आहे म्हणून हा देश अमर आहे. भगवंताच्या नावाचे संकीर्तन केल्याने पापं पळून जातात, जे मन विकाररहित होतं ते निर्मल होतं तेच मन देवासाठी प्रेमाने कोमल होतं. आत्म्यात परमात्मा आहे म्हणून देहाला किंमत आहे नाहीतर देहाची मातीच आहे. म्हणून म्हटल्या जाते देह हा पंढरी… आत्मा हा पांडुरंग.
पाचव्या पुष्पाचा समारोप हा संत गजानन महाराजांची आरती भागवत आरतीने करण्यात आला. कथेनंतर दैनंदिन हरिपाठ व हभप अच्युत महाराज बोराडे महाराज यांचे हरिकीर्तन पार पडले.
श्रींच्या महाप्रसादाचे अविरत अन्नछत्र…
श्रींचा प्रगटदिन महोत्सव शांतीवन अमृत तीर्थावर हजारो भाविकांच्या गर्दीत पार पडत आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थांनच्या वतीने अविरत अन्नछत्र सुरू असून अन्नछत्रात दररोज सुमारे १० हजार पेक्षा जास्त भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये दररोज ८ क्विंटल गव्हाच्या पोळ्या, ५ क्विंटल भाजी, २ क्विंटल भात,१ क्वि.शिऱ्याचा प्रसाद वितरीत होत आहे
महोत्सवात आज रक्तदान शिबिर
प्रगट दिन महोत्सव निमित्त संस्थान द्वारा दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबीर पार पडणार आहे गुरुवारी पार पडणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयाची रक्तसंकलन चमू येणार असून रक्तदान शिबिर हे स. ११ ते ४ दरम्यान पार पडणार आहे ज्या भक्तांना रक्तदान शिबिरात भाग घ्यायचा असेल त्यांनी थेट कार्यक्रमस्थळी पोहचुन सहभाग नोंदवावा,