चांदूर रेल्वेच्या महिला महाविद्यालयातील प्रकार
विवाह हा वैयक्तीक प्रश्न – आदित्य ठाकरे
तर पंकजा मुंडेंनी ट्विट करून तिव्र नाराजी केली व्यक्त
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
‘कोणी कुणाशी विवाह करावा आणि कसा करावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये.’ असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चांदूर रेल्वेतील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रेमविवाह न करण्याची शपथेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदित्य ठाकरे दादरच्या शिवाजी मंदिर येथे महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत ते बोलत होते. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या शपथवर तिव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता प्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर राज्यातील राजकारण तापले आहे.
जागतिक प्रेमदिनाच्या आदल्या दिवशी चांदूर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापकांनी विद्यार्थीनींना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनींकडून घेतली आहे.
मात्र भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ” चांदूर रेल्वे येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का ? आणि ती ही प्रेम न करण्याची. ‘मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. तर विवाह हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्हटले. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील हे प्रकरण आता राज्यपातळीवर पोहचले आहे.
शपथ घेण्यासाठी कुठलीही जबरदस्ती केली नाही – प्राचार्य हावरे
हिंगणघाट येथील कांड, धामणगाव येथील मर्डर प्रकरण, दोन वर्षाच्या आधी नैराश्यातून चांदूर रेल्वेत एका मुलीने रेल्वेखाली आत्महत्या केली होती हे सगळे प्रकरणे बघितली तर समाजामध्ये जे वातावरण तयार झाले आहे त्या पाठीमागे काहीतरी सुप्त प्रेमाच्या मुला-मुलींच्या भावना प्रज्वलित झाल्या आहे. त्याच्या पाठीमागे सर्व शारीरिक आकर्षण आहे. प्रेम हे मूल्यावर आधारित केलं पाहिजे, मूल्य असली पाहिजे, स्वभाव जुळले पाहिजे, काही कालखंड सोबत राहिले यानंतर प्रेम जुळले ते प्रेम यशस्वी होतात. महिला विद्यालयात मुली असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही जाणीव उजरली पाहिजे. विकृत प्रेमविवाह कुठेतरी होऊन नये यासाठी एक प्रण केलं पाहिजे म्हणून सदर शपथ घेण्यात आली. ही शपथ ज्यांना घ्यायची आहे त्यांनी घेतली, यासाठी कुठलीही जबरदस्ती करण्यात आली नसल्याचे प्राचार्य राजेंद्र हावरे यांनी सांगितले.
प्रकरण महाविद्यालयाच्या अंगलट येणार ?
अनेक प्रेमविवाह हे यशस्वीरित्या होत असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. व यातच महिला महाविद्यालयातील प्राध्यापक प्रदीप दंदे यांच्या कल्पनेतुन त्यांनी विद्यार्थीनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्यामुळे सदर प्रकरण महाविद्यालयाच्या अंलगट येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.