चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीला जिल्हास्तरावर हा उपक्रम राबविण्यास सुरू झाली असतांना आता तालुकास्तरावर सुध्दा ही थाळी सुरू करण्यात आली असुन चांदूर रेल्वे शहरात “शिवभोजन थाळी” चे गुरूवारी थाटात उद्घाटन करण्यात आले.
शहरात दररोज बाहेरून येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे येणाऱ्या गरजू व गरिबांना अल्पदरात जेवण मिळावे या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. स्थानिक संताबाई यादव नगर परिसरात कोरणाचे संकट असतांना गरिबांनाही जेवन मिळावे याकरिता शिवभोजन थाळीचे उद्घाटन गुरूवारी तहसीलदार राजेंद्र इंगळे व ठाणेदार दीपक वानखडे यांच्या हस्ते रिबीन कापुन करण्यात आले. सदर थाळीचा उपक्रम हा संचालक सागर बोंडे हे पुढे चालविणार आहे. यामध्ये केवळ पाच रूपये प्रति थालीप्रमाणे दररोज जास्तीत जास्त १०० थाळी देता येणार असुन याचा वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत असणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टु सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य अमोल होले, डॉ. सागर वाघ, नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, बंटी माकोडे, संचालक सागर बोंडे, जितू खडसे, अजिंक्य वाघ, निलेश ढेपे, संजय आमले, रवी माकोडे आदी उपस्थित होते.