अमरावती :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यापूर्वीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे सदर आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहील. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
त्यानुसार जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा सकाळी 8 ते 2 पर्यंत सुरू राहतील. त्याचप्रमाणे, जिल्हा सीमेवरून प्रवेश करणा-या वाहनांना प्रतिबंध करण्याबाबतचे आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहतील. त्याचप्रमाणे, वाहतूक सेवा व पासेससंबंधीच्या तरतुदीही या मुदतीत कायम राहतील.
या तरतुदींचा भंग करणा-या संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षकाहून दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या कार्यवाहीसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा माल, धान्य दुकाने, दुध, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे, पशुखाद्य, कृषी सेवा केंद्रासंबंधी सर्व दुकाने दररोज सकाळी 8 ते 2 या कालावधीत सुरू राहतील.
0000