मुंबई – आधुनिकतेमुळे मोडकळीस आलेली भारतीय कुटुंबव्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी झटणार्या आणि ‘लव्ह जिहाद’मुळे महिलांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात नारीशक्तीला जागृत करणार्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या रूपातील एका रणरागिणीला समाज मुकला आहे. व्याख्यानांच्या माध्यमांतून राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ विचारांचे बीजारोपण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत करणार्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे कार्य राष्ट्रप्रेमी समाज कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्री. घनवट यांनी म्हटले की, ‘चला नाती जपूया’, ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी ३ सहस्रांंहून अधिक व्याख्याने दिली. अनेक वर्तमानपत्रांत स्तंभलेखनही केले. ‘तुटणारी घरे वाचली पाहिजेत’ आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या छुप्या आक्रमणांपासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवले पाहिजे’, या भावनेने त्या कार्य करत होत्या. व्याख्यानांच्या माध्यमांतून त्यांनी केवळ समाजप्रबोधनाचे कार्य केले असे नाही, तर महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि संस्कृतीप्रेमी मंडळे यांना राष्ट्रनिष्ठेच्या धाग्यात गुंफले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मातृवत् प्रेम दिले; म्हणून आज त्यांनी दिलेल्या विचारांनुसार राष्ट्र आणि धर्म हिताची कृती करण्याचा संस्कार सहस्रो लोकांवर झाला. केवळ महिलाच नव्हे, तर दुर्बल घटकांतील लहान मुलांचे संगोपन आणि शिक्षण यांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी चालवलेली चळवळ ही एकांड्या शिलेदाराप्रमाणे असली, तरी त्यांच्या धारदार विचारांच्या माध्यमातून राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही विचारांचे खंडण अव्याहत होत राहिले. त्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींपासून समाज सजग झाला. त्यांचे हे कार्य कधीही विस्मरणात न जाणारे आहे.