माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचे निघाले आदेश ; खरीपांच्या पिकांना मिळणार जीवदान
प्रतिनिधी:- दिपक गित्ते
परळी दि. ०८ —ऊसासह खरिपांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीनंतर पाटबंधारे विभागाने मंगळवारी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचे आदेश काढले. या आदेशाने आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे परळी तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर या खरीपाच्या पिकासह ऊसाचे पीकही संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पिकांना जीवदान देण्यासाठी माजलगाव धरणासह वाण धरणाचे पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली होती व यावर तातडीने आदेशित करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी यांनी काल मंगळवारी सायंकाळपासून पाणी सोडण्याचे आदेश काढले. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हे आदेश काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आदेशामुळे पाणी उपलब्ध झाल्याने पावसा अभावी कोमेजून जात असलेल्या खरिपाच्या पिकासह ऊसालाही जीवदान मिळाले आहे. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच पिके वाचल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.