राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील विजबिले कमी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष विजग्राहकांची फसवणूक करून, आता कोणतेही वीजबिल माफ होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून सर्वसामान्यांना आलेली वाढीव बिले तत्काळ माफ करावीत अशी मागणी संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर येथील वीजवीतरण कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांना हे निवेदन भाजप पदाधिकऱ्यांचा वतीने देण्यात आले. यावेळी आमदार विजय देशमुख, प्रशांत परिचारक, श्रीकांत देशमुख आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, लॉकडाऊन काळात घरोघरी रिडींग घेता आलेले नाही, याकाळात विजबिलाबाबत पर्याय काढायला हवे होते, मात्र तसे न होता, सरसकट गोरगरिबांना देखील अव्वाच्या सव्वा विजबिले देण्यात आली आहेत. दरम्यान भाजपने विजबिले दुरुस्त करण्याची मागणी केल्यावर राज्य शासनाने ही विजबिले दुरुस्त करण्यात येतील असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात आता ऊर्जा मंत्री यांनी ग्राहकांची वीजबिले माफ होणार नसल्याचे सांगितले आहे. या राज्य शासनाच्या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शासनाने तत्काळ विजबिले माफ करावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.