सांगली/ कडेगांव
पुणेपदवीधर मतदार संघातील भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ रविवार 29 नोव्हेंबर रोजी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदार महासंपर्क अभियान राबविण्यात आले. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली.
पदवीधर व शिक्षक मतदार संघातील या अभियानात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यात माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे खा.जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह महापालिका पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यापासून मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुखापर्यंत हजारो कार्यकर्ते पदवीधर व शिक्षक मतदारांशी घरोघर जाऊन प्रत्यक्षात संपर्क केला. जाहीरनामा, परिचयपत्रक, मतपत्रिका नमुना, मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले. पारंपरिक प्रचार साधनाबरोबर मोबाईल अँप, आधुनिक साधनांच्या माध्यमातून मतदान स्लिपचे वाटप करण्यात आले. एसएमएस, प्रत्यक्ष फोन, व्हाईस कॉल, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. संस्थात्मक पातळीवर मतदानाची रचना पूर्ण करण्यात आली आहे. सुरवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत संग्रामसिंह देशमुख व जितेंद्र पवार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेऊन सोलापूर जिल्ह्यात नेतेमंडळी सोबत चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष पासून बूथ स्तरावरील कार्यकर्त्याच्या माध्यमातून पदवीधर मतदार महासंपर्क अभियानातून संग्रामसिंह देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या अभियानात बोलताना जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, संग्रामसिंह देशमुख यांचे वडील संपतराव अण्णा देशमुख यांनी 1995 साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदारांना बरोबर घेऊन मंत्री पद घेऊन सात पिढ्यांची सोय करता आली असती. परंतु शेजारधर्म पाळून दुष्काळी 14 तालुक्याना टेंभू, ताकारी योजना उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली. अंदाजपत्रक मंजूर नसताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या मदतीने बळीराजा व पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेल्या. पाया संपतराव आण्णाचा व कळस देवेंद्र फडणवीस यांचा असे चित्र दिसू लागले आहे. कर्ज रोखे उभारून कामास सुरवात केली. अशा सत्तेला लाथ मारून दुष्काळी तालुक्यातील जनतेला साथ देणाऱ्या संपतराव आण्णाचे सुपुत्र संग्रामसिंह देशमुख भाजपने उमेदवार दिल्याने त्यांचे उपकार एक मत देऊन फिटणार नाहीत असे शेतकऱ्यांचे पदवीधर मतदार बोलू लागला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात संग्राम देशमुखांना एकतर्फी मताधिक्य मिळणार असल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले. तसेच शिक्षण मतदार संघातील उमेदवार जितेंद्र पवार हेही ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करून आदर्श पिढया घडवणाऱ्या गुरुजनांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी भाग घेणार आहेत. ज्ञान व क्रीडेचा संगम साधणारे उमेदवार असणारे जितेंद्र पवार यांच्याविषयी आपुलकी आहे. तेही सोलापूर जिल्ह्यात मताधिक्य घेणार आहेत. आम्ही सर्वजण जिवाचे रान करून रात्रीचा दिवस करून मतदानाची टक्केवारी वाढवून सोलापूर जिल्ह्यात संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांना जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या व पदाधिकाऱ्याच्या साथीने मताधिक्य देणार असल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले
Home ताज्या घडामोडी सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या पदवीधर व शिक्षक मतदार महासंपर्क अभियानास प्रचंड प्रतिसाद ...