*लाली व व्हाईट हाऊस लॉनलाही ठोठावणार दंड*
अमरावती, दि. १५ : लग्न समारंभात ५० उपस्थितांची मर्यादा असतानाही त्याहून अधिक गर्दी आढळल्यास लॉनचालकांवर कारवाई करण्याची धडक महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे. त्यात आज सिद्धार्थ मंगल कार्यालयाकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत मर्यादित संख्येचे व गर्दी टाळण्याचे निकष न पाळणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे.
मर्यादेहून अधिक व्यक्ती असलेल्या समारंभात प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. लाली लॉन व व्हाईट हाऊस लॉन येथेही मोठी गर्दी आढळून आल्याने या लॉनचालकांनाही नोटीस जारी करण्यात येत आहे. त्यांनाही मोठा दंड ठोठावण्यात येत असल्याचे पालिकेचे बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण यांनी सांगितले.
०००