सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : काळ आणि वेळ काही सांगून येत नाही असं म्हणतात. याचाच प्रत्यय आज सिंदेवाही तालुक्यातील अरसोडे कुटुंबाला आला आहे. सिंदेवाही तालुक्यामधील कच्चेपार गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. यात कुटुंबातील ५ सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सिदेवाही तालुक्याजवळ राहणारे अरसोडे कुटुंबीय एका मिनीट्रकनं लग्नाला चालले होते. मात्र अचानक रस्त्यात त्यांचा मिनीट्रक उलटल्याची घटना घडली. ट्रक अचानक उलटल्यामुळे अनेकजण ट्रकखाली दबले तर काही जण गंभीर जखमी झाले. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत करत जखमींना सिंदेवाहीतील रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि पुढील तपास सुरु आहे.