विमानतळ विकासाला मिळणार गती *अमरावती विमानतळासाठी साडेसहा कोटी*

0
850

*पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश*

*_रनवे, संरक्षण भिंतीसह अनेक कामांना मिळेल गती_

 

अमरावती, दि. 2 :अमरावती येथील विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, अमरावती विमानतळासाठी 6 कोटी 45 लक्ष रूपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झाला आहे.

_जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या अमरावती विमानतळाच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला._

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला निधी वितरीत करण्यात येतो. त्यानुसार राज्य शासनाकडून 2020-21 या वर्षात विविध विमानतळांसाठी 128 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. त्यात अमरावती विमानतळासाठी सव्वादोन कोटी रूपये निधी यापूर्वीच वितरीत करण्यात आला. तथापि, विमानतळाची विविध कामे पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. पवार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते.

विमानतळाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने विमानतळाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक 2021-22 मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार शासनाकडून निधी वितरीत करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व त्यानुषंगाने औद्योगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. येथील उद्योगवाढीसाठीही पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा व प्रयत्न होत आहेत. मेक इन महाराष्ट्रअंतर्गत नवे उद्योगही अमरावतीत उभारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध झाल्याने अमरावती विमानतळाचे काम लवकरच गती घेईल. जिल्ह्याच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

*अनेक कामे लागणार मार्गी*

अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे होत आहे. विमानतळाचा अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी व येथील व्यापार- व्यवसाय, उद्योगवाढीच्या दृष्टीने लाभ होणार आहे. शासनाकडून प्राधिकरणाला निधी प्राप्त झाल्याने आता धावपट्टी, संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशा यांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या कामांमध्ये बडनेरा- यवतमाळ राज्य वळण महामार्गाचे बांधकाम, विमानतळावर 1 लाख लीटर क्षमतेचे भूमिगत पाणीसाठा (जीएसआर) व्यवस्था झाली आहे. संरक्षण भिंतीच्या 15 कि.मी. लांबीच्या बांधकामातील एटीआर 72-500 कोड सी-3 विमानाच्या तात्काळ उड्डाणासाठी आवश्यक साडेसात किमी संरक्षण भिंतीच्या कामाबरोबरच इतर एकूण साडेबारा कि. मी. काम पूर्ण झाले आहे. जवळजवळ अडीच कि. मी. बाकी आहे. निधी प्राप्त झाल्याने ते पूर्ण होईल. धावपट्टीचे विस्तारीकरण, टॅक्सीवे, अप्रॉन, आयसोलेशन बे, पेरिफेरल रोड, जीएसई एरिया, स्वच्छता यंत्रणा आदी कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय इमारत व फेज-1 व 2 मधील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे, असे श्री. उपशा यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व राज्य महामार्गाला जोडणारा 03. 10 किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 चे मजबुतीकरण, सुधारणा, त्याचप्रमाणे, डीव्हीओआर सेक्शनजवळील निंभोरा- जळू ॲप्रोच रोडचे बांधकाम या अडीच किलोमीटर लांबीच्या कामालाही गती मिळणार आहे.

000