*पक्षकारांनी लाभ घेण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला एस. जोशी- फलके यांचे आवाहन*
अमरावती, दि. ४ : _न्यायालयात प्रलंबित वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे १० एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी त्याचा लाभ घेऊन परस्परांतील वादांना पूर्णविराम द्यावा, असे आवाहन अमरावतीच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा सत्र न्यायाधीश उर्मिला एस. जोशी- फलके यांनी केले आहे._
लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित प्रकरणे व दाखल न झालेली (दाखलपूर्व) प्रकरणे परस्परांतील सामंजस्य व तडजोडीने मिटवता येतील. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना मदत करणार आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. संतानी यांनी कळवले आहे.
तडजोडीचे प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीसमोर ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाकडे संपर्क साधावा. पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000