अमरावती, दिनांक ११ एप्रिल– हिंदू जनजागृती समितीतर्फे १३.४.२१ या दिवशीं असलेला हिंदूंचा नववर्ष दिन अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘आदर्श रामराज्य पाहण्यासाठी हिंदु राष्ट्राची संकल्पना’ या विषयावरील आॅनलाईन व्याख्यानाचे आयोजन रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी, सायंकाळी ५ वाजता करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशवंदनाने करण्यात आली. व्याख्यानाचे सूत्रसंचालन व उद्देश कु. शबरी देशमुख यांनी विषद केला.
नागपूर चे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विद्याधर जोशी, यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना, हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता व त्यासाठी हिंदू धर्म व राष्ट्र प्रेमींनी करावयाचे प्रयत्न यावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सध्या भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण राष्ट्रविरोधी घटकांडून केले जात आहे. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना आतंकवादी ठरविण्यात येत आहे, तर शिवाजी महाराजांचा इतिहास काही ओळीतच सांगीतल्या जात आहे. देशात १५ -२० लाख लोकांचे दरवर्षी धर्मांतरण होत आहे. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी अर्थसंकल्पात ५हजार २९ कोटींची तरतुद केली जाते. भारतीय राज्यघटनेत हिंदूंना धर्म शिकवण्यास प्रतिबंध आहे तर अल्पसंख्याकांना धार्मिक शिक्षणासाठी अनुदान मिळते. परंतु गेल्या ५-७ वर्षातील बदल पहाता देशाची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हिंदूंनी हिंदु राष्ट्राचे फक्त साक्षीदार न होता त्यांनी आपल्या विचाराचे, कौशल्याचे तसेच तन, मन, धनाचे दान देऊन प्रसंगी प्राणांचेही बलिदान देऊन हिंदु राष्ट्राचे भागीदार होणे ही कालाची गरज आहे.”
आपल्या व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे अमरावती चे समन्वयक श्री निलेश टवलारे, यांनी गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाची सुरुवात का?, गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्व, गुढी उभारण्याचा विधी व छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व गुढीपाडवा याविषयी होणारा अपप्रचार याचे खंडन करून धार्मिक व राष्ट्रीय विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.यावेळी श्री. निलेश टवलारे यांनी गुडीपाडव्याला भुमी नांगरली तर प्रजापती लहरींचा संस्कार झाल्यामुळे भूमीची अंकुरण्याची क्षमता वाढते, अशी महत्वपूर्ण माहिती सांगीतली.
या व्याख्यानाचा लाभ समाजातील ७५ धर्मप्रेमी व राष्ट्र प्रेमींनी करून घेतला. कार्यक्रमातून अत्यंत उपयुक्त माहिती मिळाल्याचे तसेच असे कार्यक्रम नियमित होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया काही धर्मप्रेमींनी व्यक्त करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सांगता धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून करण्यात आली.