*सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध संस्थांची साथ*
– *पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*
अमरावती, दि. ८ : मुंबईच्या अवादा फाऊंडेशनतर्फे जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाच व्हेंटिलेटर व २० कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना ते वितरित करण्यात येतील. सामाजिक उत्तरदायित्व जाणून अनेक संस्था या संकटकाळात मदतीसाठी पुढे आहेत हे दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केली.
मुंबईच्या अवादा फाऊंडेशनतर्फे पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाच व्हेंटिलेटर व २० कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत खाटांची संख्या, ऑक्सिजन, औषध साठा आदी पुरेशी सामग्री उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना विविध संस्थांची साथ मिळत आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व विविध संस्थाच्या सहकार्यातून लवकरच आणखी व्हेंटिलेटर, कॉन्सन्ट्रेटर आदी सामग्री उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांत पुरेशी उपचार साधने उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. विविध संस्था, उद्योग यांनीही सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.
०००