वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये वरुड – मोर्शी तालुक्याचा समावेश करण्याची आमदार देवेंद्र भुयार यांची मागणी !
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याबाबत झाली चर्चा !
वरुड तालुका प्रतिनिधी :
वैनगंगा (गोसीखुर्द), नळगंगा (पूर्णा तापी), कन्हान वर्धा नदीजोड प्रकल्पामध्ये वरुड-मोर्शी तालुक्याचा पाण्याच्या अतिशोषीत प्रदेशाचा समावेश करुन पाण्याचा लाभ मिळण्याबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
वरुड मोशी तालुक्यामध्ये संत्रा हे मुख्य पिक असून विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांची आर्थीक घडी शेतीवर अवलंबून असल्यामुळे सद्यास्थितीत पाण्याची पातळी अतिशय खोल गेल्यामुळे मोर्शी वरुड तालुका अतिशोषीत असून विहीरी बोअर खोदण्यास बंदी आहे. वरुड तालुक्यामध्ये लघु प्रकल्प १५ असून ते पावसाच्या अनियमीततेमुळे कमी अधीक प्रमाणात भरतात त्यामुळे लाभ क्षेत्रातील भागाला पूर्ण लाभ मिळू शकत नाही. पंढरी मध्यम प्रकल्प एकमेव असून काम प्रगतीपथावर आहे. त्याची साठवण क्षमता ६२.०० द.ल.घ.मी असून ११०० कोटी रुपयांची द्वीतीय सु-प्र.मा. मंजूर आहे. मतदार संघामध्ये कोणतीही मोठी नदी नसून मतदार संघाच्या सिमेवर, नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सिमेला लागून वर्धा नदी वाहत असून महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवर पिपलागड येथे वर्धा नदीवर डायव्हर्शन बॅरेज बांधून (४४१ मीटर तनांक) पंढरी मध्यम प्रकल्पामध्ये वळण कालव्याद्वारे ५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा भरणे प्रस्तावित असून काम पूर्णत्वाच्या अवस्थेत आहे. त्या पाण्याच्या उपलब्धतेवर त्यावेळेस पंढरी मध्यम प्रकल्पाचे ६२ द.ल.घ.मी.पाणी पैकी ५२ द.ल.घ.मी. पाणी प्रस्तावित आहे.
याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, होशंगाबाद (मध्यप्रदेश) अंतर्गत कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, मुलताई जि. बैतूल, (म.प्र.) अंतर्गत वर्धा खोऱ्यातील सिंचन योजनेसंबंधातील माहिती घेतली असता त्यांचेकडे २७ द.ल.घ.मी क्षमतेचे एकून १८ लघुप्रकल्प पुर्ण निर्माणाधिन आहे. तसेच सद्या त्यांच्याकडे वर्धा मध्यम उपसा सिंचन प्रकल्प शेरगढ़, प्रभात पट्टण जवळ पुर्णत्वाच्या अवस्थेत आहे. त्याची क्षमता २३ द.ल.घ.मी. आहे. तसेच त्यांनी उपसा सिंचन योजना करण्याचा सपाटा लावला असून मध्यप्रदेशच्या मालकीचे कोणतेही पाणी महाराष्ट्राला मिळणार नाही. ही चिंतेची बाब असल्यामुळे मोर्शी वरुड मतदार संघातील ११०० कोटी रुपयांचा पंढरी प्रकल्प निरोपयोगी ठरण्याची शक्यता आहे.
वरुड मोर्शी तालुक्याला अतिशोषीत अवस्थेतून पाण्याच्या दृष्टीने परीपूर्ण करण्याकरीता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून पाणी पुरविण्यात यावे. त्याकरीता कन्हान – वर्धा नदी जोड प्रकल्प हा पर्यायही तपासून पाहण्यासाठी सचिव, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांना आमदार देवेंद्र भुयार यांनी सुचित केले आहे. संबधीत बाब मोर्शी वरुड तालुक्यातील अतिशोषीत भागासाठी आवश्यक असल्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री व अधिकारी यांची बैठक आयोजित करून वैनगंगा (गोसीखुर्द), नळगंगा (पूर्णा तापी), कन्हान वर्धा नदीजोड प्रकल्पामधे वरुड मोर्शी तालुक्यमधील सिंचनाच्या पाण्याचा अतिशोषीत प्रदेशाचा समावेश करुन शेती सिंचन पाण्याचा लाभ मिळवून देण्याची विनंती आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरुड तालुका अध्यक्ष बाळू पाटील कोहळे, संदीप खडसे, धीरज अंबाडकर, नितीन श्रीराव, अरुण डोईजड, रोशन दारोकर यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.