विनायक देशमुख :-
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरातील गेल्या आठवडा भरापासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिंपळगाव राजा परिसरातील भालेगाव,कुंबेफळ, उमरा,हिवरा खुर्द,भंडारी,निपाना, बोरजवळा ,टाकळी तलाव, व आदी गावांमध्ये अतिवृष्टीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीमध्ये पावसाचे तुडुंब पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची राखरांगोळी झाली असून कपाशीच्या सरकीला कोंम्ब फुटले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेले असतांना अद्यापही संबंधित पीक विमा कंपनी ने पंचनामे केलेले नसल्याने व शासनाकडून पंचनामे करण्यात न आल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून पीक विमा कंपन्याना आदेश देण्याची मागणी रिपब्लिकन कामगार व शेतमजूर संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश इंगळे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे केली आहे.तसेच काही अल्पभूधारक शेतकरी आर्थिक परिस्थिती ने पीक विमा काढू न शकल्याने त्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त शेतकऱ्यांची दिवाळी शासनाने आर्थिक मदत देत गोड करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.निवेदनाच्या प्रति कृषिमंत्री, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आमदार आकाश फुंडकर यांना दिल्या आहेत. यावेळी बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.