शाळा फक्त ‘ती’च्यासाठी – जिल्हा परिषद चालविते एका मुलीसाठी शाळा

0
744
Google search engine
Google search engine

वर्धा –

तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे… तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! वर्ध्याच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा. ‘त्या’ शाळेची विद्यार्थी संख्या आहे फक्त एक
मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. मुलगी शिकली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर आईवडिलांना मुलींच्या भवीतव्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही. शिवाय मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलेल. शासनाचा हाच उद्देश ही शाळा पूर्ण करण्याचा ध्यास ठेवते.

तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात ही शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावं लागेल.
म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे.शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते.
या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात.शाळेत वीजही नसते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू आहेच.
हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, “धोकादायक इमारत असल्यास तिथे विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.” कोपरा गावातील प्राथमिक शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. “विद्यार्थी संख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे.”
या गावातले काही विद्यार्थी दुसऱ्या गावी गेल्याने इथे आता दखलपात्र विद्यार्थी शिल्लकच नाहीत. एखाद्या गावात विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्यास जे थोडेबहुत विद्यार्थी असतात, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या गावातील शाळेत पाठवलं जातं. मात्र तनुच्या बाबतीत ते शक्य नव्हतं.
याबाबत गटशिक्षणाधिकारी बारसागडे यांनी सांगितले की, “एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो.” “मात्र या गावापासून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच शाळेत येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. या गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे दखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे.” त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणे क्रमप्राप्त होते. तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे”. यातून शासनाची मुलींच्या शिक्षणाप्रति असलेले सकारात्मक प्रयत्न दिसून येतात.
तनुच्या शिकण्याच्या इच्छेला तिच्या पालकांनीही बळ दिलं आहे, हे उल्लेखनीय. ”ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं,” असं तिचे वडील राजू मडावी यांनी सांगितलं.”शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं,” त्यांनी पुढे सांगितलं.
या शाळेचे एकमेव शिक्षक अरुण सातपुते गेल्या सहा वर्षांपासून या शाळेत शिकवत आहेत. चार महिन्यांच्या पावसाळ्यामध्ये तर ते पायीच शाळा गाठतात.
कोपरा गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा पाचवीपर्यंत आहे. कोपरा गावाचं पुनर्वसन झाल्याने नागरिक दुसऱ्या गावी स्थलांतरित झाले आहेत. सध्या या गावाची लोकसंख्या फक्त 64 आहे. त्यामुळे मुलांची संख्या वाढेल, याची चिन्हं काही दिसत नाहीत.त्यामुळे कदाचित पाचवीपर्यंत तनूला या शाळेत एकटीनेच जावं लागेल, असं सध्यातरी चित्र दिसत आहे.

तनुला डॉक्टर व्हायचं आहे…

शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर तिने सांगितलं, “मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे.” यातून तिची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.